नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रायगड/प्रतिनिधी – रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच आता वंचित बहुजन आघाडीही उतरली आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबाग येथील छ.शिवाजी महाराज आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत-गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले. रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दक्षिण महासचिव सागर भालेराव, उत्तर महासचिव वैभव केदारी, महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग समनव्यक ऍड सचिन गायकवाड, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, आदींसह राज्य, जिल्हा तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते, महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचित च्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्या तुलनेत ‘वंचित’ च्या कुमुदिनी चव्हाण या नवख्या उमेदवार आहेत. तरीही त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्या उच्चशिक्षित असून मराठा समाजाच्या प्रतिनिधीत्व करतात, ही कुमुदिनी चव्हाण यांच्यासाठी जमेची बाजू आहे.