नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली आहे. गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून या नैसर्गिक आपत्तीची तत्काळ दखल घेत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात १२ हजार २७८ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अवकळी पावसामुळे शेतातील गहू, ज्वारी, संत्रा, लिंबू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले होते. मात्र, काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील वांगी, टोमॅटो, कांदा, पाकलभाजी, घोळभाजी, लिंबू, दोडके यांसह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. कारागृहातील कैद्यांना खुल्या बाजारातील कांदा खाण्याची वेळ येणार आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांचे भोजन तयार करण्यासाठी आधी दर दिवसाला भाजीपाला खरेदी करावा लागत होता. पण गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. कारागृहातील कैद्यांनी फार मेहनतीने शिवार फुलवले. यातूनच मिळलेल्या उत्पन्नातून कैदी आपल्या कुटुंबाल पैसे पाठवत असे. पण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.