राज ठाकरे यांचा युतीला कुठलाही फायदा होणार नाही- रामदास आठवले

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद/प्रतिनिधी – केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि ‘रिपाई’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप-मनसे यांच्यातील वाढत्या जवळीकीविषयी नापसंती व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचा युतीला कुठलाही फायदा होणार नाही, त्यांना युतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरे यांच्यासोबत युती करणं भाजपला महागात पडेल, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिलाय. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. रामदास आठवले यांनी मनसे-भाजप युतीबाबत विरोधही दर्शविला. ‘राज ठाकरे यांनी निळा, हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा फायदा युतीला काहीच होणार नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करायला नको, असं मत आठवले यांनी मांडलं आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, मनसेसोबत युती केल्याने भाजपला फायदा कमी नुकसानच जास्त सहन करावं लागेल, त्यामुळे आमचा मनसेसोबतच्या युतीला विरोध आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे
मुंबई महानगरपालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे अशी मागणी सुद्धा आठवले यांनी युतीकडे केली आहे. शिवसेनेवर टीका करत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्यावं, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेला मुंबईतून हद्द पार करू असा इशाराही आठवले यांनी दिलाय
‘मविआमुळे वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला’

वेदांत सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे.महाविकास सरकारने याबाबत केंद्राला माहिती देणे गरजेचं होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळेच वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचा आरोप आठवले यांनी केला

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web