डॉ शरद सराफ यांची आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – आयआयटी मुंबईचे विख्यात माजी विद्यार्थी (B.Tech. 1969, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग) डॉ शरद कुमार सराफ यांची याच संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असलेल्या व्यक्तीची पहिल्यांदाच या महत्वाच्या पदी निवड झाली आहे.  गेल्या चार वर्षांपासून डॉ सराफ या नियामक मंडळाचे (BoG) सदस्य म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय, आयआयटी जम्मूच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत होते.

ते सध्या टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी 1972 मध्ये  त्यांचे भाऊ आणि आयआयटी मुंबईचे आणखी एक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी, सुदर्शन कुमार सराफ यांच्यासोबत या कंपनीची  स्थापना केली होती. त्यांच्या आधी,  केंद्र सरकारच्या अंतराळ विभागातील INSPACE चे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांच्याकडे नियामक मंडळाचे अध्यक्षपद होते

आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देतांना डॉ. सराफ म्हणाले, “मला मिळालेल्या या नवीन जबाबदारीबद्दल मी खूप उत्सुक आहे. इतिहासात प्रथमच आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्याची नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाचं एक अतिशय धाडसी पाऊल आहे, असं मला वाटतं. या पदावर काम करतांना माझी तीन प्रमुख उद्दिष्टे असतील, आयआयटी मुंबई परिसरातील  शिक्षण आणि विद्यार्थी जीवनाचा दर्जा सुधारणे, मग ते वसतिगृहाच्या पायाभूत सुविधा वाढवणे असो किंवा शैक्षणिक दर्जा असो; दुसरे, शिक्षणविषयक आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित करणे; आणि तिसरे, स्टार्ट-अप्सना पाठबळ देणे, विशेषत: अशा कंपन्या, ज्यांना आमच्या माजी विद्यार्थ्यांकडून निधी दिला जात आहे.”

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web