वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शिवाजी नगर येथील स्व. मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुरावस्था झालेले हे समाजमंदिर पाडून त्या ठिकाणी नवे समाज मंदिर बांधण्याचा शब्द कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिकांना दिला होता. त्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून नगरविकास विभागाने यासाठी १.५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वालधुनी परिसरातील शिवाजी नगर भागात असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे समाज मंदिराची दुरावस्था झाली होती. त्यामुळे हे समाज मंदिर मोठ्या काळापासून बंद होते. परिणामी या भागातील नागरिकांना सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे समाज मंदिर निष्काषित करून त्या जागी नवे समाज मंदिर बांधावे अशी मागणी स्थानिकांची होती. नव्या समाज मंदिराच्या उभारणीसाठी स्थानिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या समाज मंदिराच्या उभारणीसाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे दीड कोटी रूपयांच्या निधीची मागणी ऑक्टोबर महिन्यात केली होती. स्थानिकांच्या भावना आणि खासदारांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभराच्या आत समाज मंदिरासाठी सुमारे दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी वितरीत करण्यात आला आहे. मागणीच्या एका महिन्यात हा निधी तातडीने उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web