कल्याण/प्रतिनिधी – १६ जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन संवाद सभा कल्याणमध्ये नुकतीच पार पडली.१० वर्षा पुर्वी जगभरातील घरकामगार महिलाच्या कामगार हक्का च्या लढ्याला १६ जून २०११ रोजी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (आय.एल.ओ ) कायदेशीर मान्यता मिळून घरकामगार हे कामगार आहेत हे जगभरातील सरकारांना मान्य करावे लागले. मग त्या त्या देशांनी त्यांच्या साठी कायदे करण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि त्या मुळे आज १० वर्षांनी आपल्या देशात घरकामगार आणि विशेषतः महिला घरकामगारांनी काय मिळवले यांचा आढावा संवेदनशील व्यक्ती, प्रसार माध्यमांतील सहकारी, कामगार संघटना, अन्नसुरक्षा आणि सामाजिक न्याया साठी, मानव अधिकारासाठी काम करणाऱ्या मित्र संघटनां समोर मांडण्याच्या उद्देशाने ही जनसंवाद सभा आयोजित केली होती.
या सभेस कल्याण- डोंबिवली महापालिका, उप आयुक्त रामदास कोकरे, अभियंता मिलींद गायकवाड, जेष्ठ पत्रकार बाबा रामटेके, लालबावटा रिक्षा युनियनचे कॉ.काळू कोमास्कर, महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष उदय चौधरी, रेशनिंग कृती समितीचे राज्य निमंत्रक विशाल जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललीता आखाडे आदी मंडळी उपस्थित होती.
उप आयुक्त कोकरे यांनी शुभेच्छा देतानाच शहर स्वच्छता मोहीमेत घरकामगार महीला कंपोस्ट पद्धतीने घरातल्या कच-याची विल्हेवाट कशी लावू शकतात व त्या साठीचे सोपे तंत्रज्ञान आत्मसात करुन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करु शकतात यावर भाष्य केले. तथा यामध्ये पुढाकार घेणाऱ्या घरकामगार महिलांना पालिकेकडून सहकार्याचे आश्वासन दिले.
तर लालबावटा रिक्षा युनियनचे नेते कोमास्कर यांनी शहरातील सर्व असंघटित कामगारांच्या संघटनांचा एक मंच करुन आपल्या मागण्या शासना समोर मांडण्यासाठी राजकीय दबाव गट निर्माण करावा असा प्रस्ताव सभेत मांडला या ठरावाला पांठीबा म्हणून पत्रकार बाबा रामटेके यांनी अनूमोदन देवून असंघटित कामगारांच्या या राजकीय दबाव गटाची आवश्यकता विषद केली असल्याची माहिती राष्ट्रीय घरकामगार चळवळ कल्याण विभागाचे निमंत्रक ज्ञानेश पाटील यांनी दिली.