प्रतिनिधी.
मुंबई – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनाने गिरणी कामगारांचा आवाज बुलंद करणारा सच्चा नेता हरपला आहे.तसेच आपण आपल्या निकटच्या स्नेहीला कायमचे हरपून बसलो आहोत,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री,शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर यांनी दिवंगत सेनानेत्याला श्रद्धांजली वहातांना म्हटले आहे.
दक्षिण मध्य मुंबईतून पाचवेळा निवडून येणारे सेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.त्या मुळे संपूर्ण गिरणगावात शोककळा उमटून आली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी संध्याकाळी परेल येथील शिवसेना शाखेत मोहन रावले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली आहे.त्यांच्या बरोबर खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर यांनीही दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे.
सचिनभाऊ अहिर यांनी श्रध्दांजली वहातांना म्हटले आहे,मोहन रावले यांनी आपली चोख कार्यकुशलता आणि प्रेमळ स्वभावातून सामांन्य लोकांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण केला.त्याच प्रमाणे गिरणी कामगारांची पाठराखण करून त्यांना दिलासा मिळवून दिला.सन २००२ मध्ये एन.टी.सी.च्या बंद होऊ घातलेल्या मुंबईतीच्या सरकारी गिरण्यातील कामगारांना डबल व्हिआरएस म्हणजे “मुंबई पँटर्न”लागू करावा, ही आमची मागणी तत्कालीन केंद्रीय अवजड मंत्री मनोहर जोशी यांच्या सहकर्याने लागू करून घेण्यासाठी खासदार मोहन रावले यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी कदापि विसरता येणार नाही,असेही शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर यांनी दिवंगत माजी खासदार मोहन रावले यांच्या कामगारप्रिय कामाला उजाळा देताना म्हटले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही दिवंगत माजी खासदार मोहन रावले यांना आदरांजली वाहिली आहे.