प्रतिनिधी.
बदलापूर – ठाणे जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढला आहे. या नदीच्या पातळीत कालपासून लक्षणीय वाढ झाली आहे.
मागील वर्षी याच उल्हास नदीला दोन वेळा पूर आला होता, ज्यामुळे बदलापूर शहराला मोठा फटका बसला होता. तसंच महालक्ष्मी एक्सप्रेसही याच नदीच्या पुरात अडकली होती. यावर्षी पहिल्यांदाच काल रात्रीपासून बदलापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून कर्जत परिसरातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात वाढ झालीये. त्यामुळे बदलापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र सकाळपासून या भागातल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून त्यामुळे तूर्तास बदलापूर शहराचा पुराचा धोका टळला आहे. मात्र असं असलं, तरी शासकीय यंत्रणा मात्र नदीच्या प्रवाहावर लक्ष ठेवून आहेत.