रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशन मार्फत मागील सुमारे दिड वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहेत. रक्तदान शिबिरांच्या याच श्रृंखलेमध्ये रविवारी मिशनच्या डोंबिवली झोन अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली आणि संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर येथे आयोजित दोन रक्तदान शिबिरांमध्ये १७८ निरंकारी भक्तांनी मानवतेची निष्काम सेवा करण्याच्या भावनेने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

डोंबिवली येथील शिबिरात ११० निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. त्याचे संकलन संत निरंकारी रक्तपेढी द्वारे करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ज्यामध्ये सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे तसेच स्थानिक सेवादल युनिटने महत्वपूर्ण योगदान दिले.

            उल्हासनगरच्या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक किशनलाल नेनवानी यांच्याहस्ते करण्यात आले. ज्यामध्ये ६८ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये उल्हासनगर मध्यवर्ती हॉस्पिटलने ३३ युनिट रक्त संकलित केले तर रेड क्रॉस सोसायटीने ३५ युनिट रक्त संकलित केले.  सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ.सुधाकर शिंदे यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशनच्या मानवसेवेच्या महान कार्याची प्रशंसा केली. दोन्ही शिबिरांच्या यशस्वी आयोजनामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि संत निरंकारी सेवादल स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web