नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड नदीपात्रात मृत माशांचा खच झाला आहे. खोणी गावाजवळ हे सर्व मृत मासे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होणार आहे.
मलंगगड भागातून येणाऱ्या नदीपात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी असते. या पाण्यावर अनेक ठिकाणी बारमाही शेती देखील केली जाते. मात्र वाढत्या जलपर्णीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध राहत नाही. तर असलेल्या पाण्यावर आता जलपर्णीने ताबा मिळवला असल्याने त्याचा धोका हा जलचरांना देखील बसायला सुरुवात झाली आहे.दरम्यान नदीपात्रात मृत अवस्थेत आढळलेल्या माश्यांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने उपायोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.