नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणपणाच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना निवृत्तीनंतर नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्यांच्या माध्यमातून माजी सैनिकांना कला शाखेची पदवी मिळविता येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) प्रांजल जाधव यांनी केले आहे
.सैन्य दलातील सेवेनंतर निवृत्त झालेल्या सैनिकांना इतर नोकऱ्यांसाठी पदवी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. त्यामुळे माजी सैनिकांना पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रिय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात कला शाखेतून कला पदवी (एचआरएम) प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झाला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळणेसाठी पात्रता व अटी. अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्स द्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र. माजी सैनिकाची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दिनांक ०१ जानेवारी २०१० नंतर निवृत झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षांचा अभ्यासक्रम (२ वर्ष १२ वी + ३ वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाची कोर्स शुल्क 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यात संबधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb .gov.in या संकेतस्थळी भेट द्यावे. किंवा संबधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.