नंदुरबार/प्रतिनिधी – यंदा अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातल्याचे दिसून आले आहे. सर्वच ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशीआलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यात नंदुरबार जिल्हातही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते व इतर राज्यात मिरची निर्यात केली जात असते. परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
शेतकऱ्यासह मिरची व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली मिरची खराब होण्याच्या मार्गावर आहे. व्यापाऱ्यांनी मिरची सुकवण्यासाठीटाकली होती. परंतु, अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाराची चांगलीच दाणादाण उडाली आहे. सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसात भिजल्याने खराब झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच आता व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसानझाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून आम्हा व्यापाऱ्यांना देखील मदत करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.