नेशन न्यूज मराठी टीम.
विरार/प्रतिनिधी – ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते आणि क्षणोक्षणी त्याच्या जाणीवेमध्ये जीवन जगले जाते तेव्हा आपसूकच मानवतेचे गुण जीवनात प्रविष्ट होतात.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी विरारमधील विवा कॉलेजच्या पाठीमागील मैदानावर सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमात उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमात पालघर, नाशिक, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हजारों भाविक-भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले होते. समागमाला आलेल्या विशाल जनसागराने मैदानाचा कानाकोपरा फुलून गेला होता आणि भक्तीभावनेने ओतप्रोत झालेले समागम स्थळाचे विहंगम दृश्य अत्यंत मनमोहक होते.
संत समागमाच्या दरम्यान निरंकारी राजपिताजी यांनी आपले भाव व्यक्त करताना मुख्य मंचाच्या वर अंकित असलेल्या सम्पूर्ण हरदेव बाणीतील – ‘कहे हरदेव झूठ से बचकर सत्य सदा अपनाना है’ या ओळी उद्यृत करुन सांगितले, की इथे अशा असत्य गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे जी मनुष्य सत्य मानून चालला आहे आणि अशा असत्यावर आधारित जीवन जगत आहे. खरं तर खोट्याला खरं मानणं हे काही सूज्ञपणाचं लक्षण नाही; परंतु तरीही मनुष्य खोट्यालाच खरे मानत आहे ही मोठी विडंबना आहे. सद्गुरुचा हा फार मोठा परोपकार आहे ज्यायोगे आज सत्य घरोघरी पोहचत आहे आणि इतका मोठा मानव परिवार या सत्याच्या प्राप्तीनंतर आपल्या जीवनात परिवर्तन घडवून इथे उपस्थित झाला आहे.
विरारमध्ये आयोजित या भ्रव्य-दिव्य संत समागमात जनार्दन पाटील (झोनल इंचार्ज, नाशिक झोन) यांनी सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या प्रति समस्त भाविक-भक्तगणांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच स्थानिक प्रशासन व अन्य सरकारी विभागांचे त्यांच्या पूर्ण सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.