वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्रातून धावणाऱ्या  चारही  वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत असून मुंबई ते साईनगर शिर्डी एक्सप्रेससाठी वेटिंग लिस्टचे बुकिंग देखील फुल्ल असल्याची माहिती रेल्वेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी कल्याणात दिली. दरम्यान कल्याण हे रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असल्याने या एक्स्प्रेसला कल्याणात देखील थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलद प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली असून या गाडीला पहिल्या दिवसापासूनच प्रवाशाच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स वरून शिर्डीला जाणार्या एक्स्प्रेसला सीएसटी, दादर, ठाणे आणि नाशिक रोड असे चार थांबे देण्यात आले असून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटणारी हि गाडी ११ वाजून ४० मिनिटांनी शिर्डीत पोचत असल्याने भक्तांना दिवसभरात शिर्डी दर्शन करून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघणार्या एक्स्प्रेसने रात्री ११ वाजता मुंबईत परतता येत असल्याने ही एक्स्प्रेस प्रवाशांसाठी पर्वणी ठरली आहे. यामुळेच मुंबई ते शिर्डी गाडीला पहिल्या दिवसापासून प्रवाशाचा तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. 

सुट्टीच्या दिवसाचे बुकिंग वेटिंग लिस्टपर्यत जात असून इतर तिन्ही गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र कल्याण हे जंक्शन असून या स्थानकातून दररोज ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. कल्याण आणि त्यापुढील प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करायचा झाल्यास त्यांना ठाणे किंवा दादर गाठावे लागत असून यात प्रवाशाना खूप वेळ प्रवास करावा लागत असल्याची प्रवाशाची तक्रार आहे. यामुळेच या एक्स्प्रेसला कल्याण थांबा दिला जावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web