नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मध्ये प्रबोधनकार ठाकरे तलावाच्या नुतनीकरणाचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन काही तास उलटत नाही तोच या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लहान लोखंडी गेट मोडून पडल्याची घटना घडली.
विविध विकास प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी कल्याण शहरात आले होते. यावेळी नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रबोधनकार तलावाचे देखील लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कल्याणात कार्यक्रमाला आले होते. या सरोवराच्या नुतनीकरनाच्या लोकार्पणला काही तास उलटत नाही तोच मुख्य प्रवेशद्वारा जवळील लहान गेट मोडून पडले आहे. १९ कोटी खर्च करून सरोवराच्या नुतनीकरणाचे काम केले होते. मात्र कोटींचा खर्च करून देखील अशी घटना घडत असेल तर हे या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
प्रबोधनकार ठाकरे तलावाचे नूतनीकारण स्मार्ट सिटीच्या योजनेतून करण्यात आले आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद रोडे यांच्याकडे प्रवेश दार तुटल्या बाबत विचारणा केली असता, मुख्यमंत्री ज्यावेळी तलाव परिसरात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी झुंबड उडाली होती. ही नागरिकांची झुंबड आवरणे पोलिसांच्या अवाक्या बाहेर गेल्याने गर्दीच्या रेट्यामुळे गेट निखळून पडल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पण मुख्यमंत्र्याच्या चाहत्यांवर व पोलिसांवर याचे खापर फोडले जात आहे का ? असा सवाल सामान्य नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया ऐकून पडला आहे. तर गर्दीमुळे जर लोखंडी प्रवेशद्वारातुटत असेल तर मग त्याच्या कामाच्या दर्ज्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनात उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.