नेशन न्यूज मराठी टीम.
मालेगाव /प्रतिनिधी – मौजे दहिदी ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथे बोरी आंबेदरी कालव्याला पाईप लाईनद्वारे बंदिस्त केल्याने येथील शेतकरी बांधवांनी कालव्याच्या शेजारीच धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. सदर प्रकल्पामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांना भविष्यात पाण्याअभावी खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, नाशिकपूर्व, मालेगांव तालुका व शहरातर्फे पाठिंबा जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकपूर्व सहसचिव राजू धिवरे, मालेगाव तालुकाध्यक्ष सुनील आहिरे,महासचिव शशिकांत पवार,कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे यांच्या हस्ते पाठिंबा पत्र देण्यात आले.
सदर पाठिंबा पत्रात नमूद केलेल्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडी ही येथील आंदोलक व ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कायदेशीर लढा देण्यास ग्रामस्थांच्या मदतीला खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे. त्यामुळे शासनाने सदर प्रकल्पाचे काम त्वरित बंद करून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.यावेळी तालुका सचिव संदीप महिरे,किशोर निकम,संघटक सुरेश आहिरे,सचिन आहिरे,सागर पगारे यांच्यासह इ.कार्यकर्ते उपस्थित होते.