नेशन न्यूज मराठी टीम .
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – श्री क्षेत्र पंढरपूर येथे जनतेला व भाविकांना ये जा करण्यासाठी दररोज, नित्यनियमाने मुंबई ते पंढरपूर रेल्वे सेवा चालू करून तिचे थांबे वाढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम उपाध्यक्ष सुधीर वायले यांनी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली असून याबाबत त्यांनी वारकर्यांसोबत त्यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या भक्तीस्थानांपैकी एक मुख्य मंदीर व वारकरी संप्रदायाची श्रध्दा असलेले मंदीर म्हणजेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर. तिर्थ क्षेत्र पंढरपूर येथे ये जा करणाऱ्या भाविकांची फार मोठी संख्या आहे. परंतू श्री क्षेत्र पंढरपूर येथे आठवड्यातून एकच रेल्वेची गाडी जाते व तीच गाडी परत येते. त्यामुळे पंढरपूर येथे ये जा करणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवास सहज व दररोज प्राप्त होत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना रेल्वे प्रवास सोडून अन्य मार्गाने प्रवास करावा लागतो व त्यामुळे त्यांना नाहक शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागतो व फार मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते.
भारतीय जनता पार्टीच्या धोरणानुसार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार व इच्छेनुसार, श्रध्देनुसार हिंदू धर्माच्या मुख्य मंदीरांचे शुशोभीकरण, नुतनीकरण करणे, भक्तांचा प्रवास सुखकर करणे व हिंदू लोकांमध्ये देवी देवदेवतांबद्दल असलेली आस्था, भक्ती कायम जागृत ठेवून द्विगुणीत करणे हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे भाविकांना, वारकरी लोकांना व तेथील स्थानिक लोकांना मुंबई ते पंढरपूर प्रवास करण्यासाठी दररोज सुरळीत व नित्यनियमाने एक्सप्रेस सेवा चालू करुन दयावी व अशा एक्सप्रेसचे थांबे देखील वाढवावेत त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल व अशी रेल्वे सेवा दररोज मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. अशी मागणी सुधीर वायले यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.