नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण– आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये चिमुकल्sया वारकऱ्यांनी विठूरायाच्या गजरासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला पाहायला मिळाला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून कल्याणातील नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
एकीकडे हातामध्ये टाळ मृदंगाच्या नादात विठू माऊलीचा गजर तर दुसरीकडे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारे फलकातून जनजागृतीही केली जात होती. आपली संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीला समजावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणातील नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे चिमुकल्या वारकऱ्यांची ही आनंदवारी आयोजित करण्यात येत आहे.
कल्याण पश्चिमेच्या टिळक चौकातून निघालेली ही दिंडी माता अहिल्यादेवी होळकर चौक, शंकरराव चौक करत छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ज्यामध्ये १ ली ते ४ थ्या इयत्तेतील तब्बल ५०० चिमुकले वारकरी सहभागी झाले होते. तर त्यांच्यातील विठ्ठल रुख्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीची शोभा अधिकच वाढवली. तर यंदा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केडीएमसीचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या प्रमूख उपस्थितीत या दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने ही ही दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.