आंबिवली स्मशाभूमी गेल्या ५ वर्षांपासून छताच्या प्रतीक्षेत, अंत्यसंस्कार झाल्यावर पावसाळ्यात वारंवार द्यावा लागतोय अग्नी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – आंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये होणारे अंत्यसंस्कार पाहिल्यानंतर इथल्या मृतदेहांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंबिवली गावातील स्मशानभूमीमध्ये पत्र्याच्या शेडअभावीच अंत्यसंस्कार करावे लागत असून तर पावसाळामुळे वारंवार अग्नी द्यावा लागत असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली आहे.

आंबिवली गावामध्ये स्मशानासाठी जागा नसल्याने 5 वर्षांपूर्वी स्थानिक तरुणांनी एकत्र येत लोक वर्गणीतून नदीकिनारी असणाऱ्या जागेवर स्मशानभूमीसाठी पायाभरणी केली. तसेच जमा झालेल्या निधीमध्ये प्रेत जाळण्यासाठी आवश्यक चौथरा बांधत शेड टाकण्यासाठी सिमेंटचे खांबही उभे केले. मात्र उर्वरित बांधकामासह पत्र्याचे शेड उभे करण्यास निधी कमी पडल्याने पूढील सर्व काम ठप्प झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. परिणामी याठिकाणी गेल्या ५ वर्षांपासून शेडविनाच अंत्यसंस्कार होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात तर इथल्या प्रेतांची अधिकच हेळसांड होत असून कित्येकदा पावसाळ्यात अर्धे प्रेत जळून विझून गेलेले असते. परिणामी पाऊस थांबल्यावर पुन्हा अग्नि द्यावा लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान या स्मशानभूमीमध्ये पत्रे बसवण्यासाठी स्थानिक लोप्रतिनिधींनी आश्वासने दिली होती. परंतू अद्याप त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना बहुधा वेळ मिळालेला दिसत नाहीये. मात्र आपापसातील हेवेदावे विसरून या स्मशानभूमीचे अर्धवट राहिलेले काम यावर्षी तरी पूर्ण करावे इतकीच भाबडी आशा इथले स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web