नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर आसपासच्या भागातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ठाणे, मुंबई किंवा उल्हासनगर येथे जावे लागत होते. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे लागत होते. त्यांना लांब प्रवास करावा लागत होता. प्रवास दरम्यान असणारी गर्दी तसेच प्रवासाला लागणारा खर्च ,वेळ त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परंतू आता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्वाची तपासणी (अपंगत्वाची टक्केवारी ) महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आजपासून सुरु होत आहे.
बाई रुक्मिणीबाई रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ. हेमंत राऊत , फिजीशियन डॉ. मिलन पाटणकर, आयएमए कल्याण या संघटनेने उपलब्ध करुन दिलेल्या नेत्ररोग तज्ञ डॉ. अर्चना लावणकर, मानसोपचार तज्ञ डॉ. अव्दैत जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित केल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्तींना महापालिका स्तरावरुन वितरीत करण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या बुधवारी त्यांची दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत तपासणी करुन त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र वितरीत केले जाणार असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचे सदर प्रमाणपत्रासाठी मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणचे हेलपाटे वाचून दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण हे इतर आजूबाजूच्या परिसराला जोडणारे मध्य शहर असल्याने प्रवासाच्या दृष्टीनेही दिव्यांगाना सोयीस्कर होणार आहे.
आज पहिल्या दिवशी आरोग्य विभागाचे उपआयुक्त सुधाकर जगताप, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त अर्चना दिवे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद भंडारी आणि बाई रुक्मिणी बाई रुग्णालयाचे प्र. मुख्य वैदयकीय अधिकारी संदीप पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकुण 48 दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.