नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सद्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असून या स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका मुख्यालय, एसटी डेपो, कोर्ट आदी मोक्याच्या जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे आरोप राष्ट्रवादी कडून होत आहे. याबाबत आवाज उठवीण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे आणि जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांच्या वतीने कल्याण रेल्वे स्टेशन समोर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, रमेश हनुमंते, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सर्व सामान्य जनतेसाठी सोयीच्या असलेल्या महत्वपूर्ण जागा स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्थलांतरित करण्याचा डाव थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली आहे.
सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला स्मार्ट सिटी चे काम काही नेते व बिल्डर यांना विशेष लाभ पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. कुठलाही काम काय उद्देशाने सुरू आहेत ते सर्व सामान्यांना कळायला मार्ग नाही. स्मार्ट सिटी च्या नावाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय हे कचोरे गाव येथे हलविण्याचे प्रयत्न चालू आहेत. जे फार लांब आहे. सध्याच्या ठिकाणी असलेला महापालिका मुख्यालय सर्व दृष्टीकोनातून नागरिकांच्या सोयीचे व हिताचे आहे. या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिका मुख्यालयाची जागा कुठल्या बिल्डर ला देण्यासाठी सर्व खटाटोप चालू आहे का ? असा प्रश्न या बाबत राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या सर्व प्रकारे सोयीचे असलेले कल्याण स्टेशन समोरील एसटी डेपो गांधारी गावाकडे हलविण्याचे षडयंत्र सुरू आहे. हा एसटी चा भूखंड कोणाच्या घशात घालण्याचे प्रयत्न चालू आहेत असा सवाल उपस्थित करत संपूर्ण तालुक्यातील जनतेला सोयीचे असलेले कल्याण न्यायालय (कोर्ट) हे ही बारावे गाव व इतर कुठेतरी हलविण्याचे षडयंत्र सुरू आहे, या ही भूखंडावर नक्कीच कोणाची तरी वक्रदृष्टी पडलेली दिसते, नाहीतर न्यायालाय असलेल्या ठिकाणीच टावरचा प्लान मंजूर झालेला असून आता असे काय घडले की न्यायालयच (कोर्ट) हटविण्याचा खेळ सुरू झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
त्यामुळे याबाबत आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम राबवत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या सह्यांच्या मोहिमेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, रमेश हनुमंते, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी, माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे, जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन, विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव, उमेश बोरगावकर, शरद महाजन, सुनिता देशमुख, संगीता मोरे, बेबी शर्मा, रमजान अन्सारी, सलाम शेख, योगेश माळी, रामचंद्र यावलकर, सुरेश जोशी, भिलारे, करुणा कातकडे, रमेश साळवे, अयाज मौलवी, भगवान साठे, पांडुरंग चव्हाण, शैलेंद्र जोगदंड आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.