नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – मानव एकता दिवसाच्या निमित्ताने बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार,२४ एप्रिल रोजी संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण देशामध्ये महा रक्तदान अभियान चालविण्यात आले ज्यामध्ये २७२ रक्तदान शिबिरे लावण्यात आली व जवळपास ५० हजार यूनिट रक्त संकलित करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये यापैकी ५९ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली.
या रक्तदान अभियानाअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ३५४ यूनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरामध्ये डोंबिवली व्यतिरिक्त कल्याण तसेच उल्हासनगर भागातील निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. याशिवाय चेंबूर येथे ८९३ तर नालासोपारा येथे ९१६ यूनिट रक्त संकलित करण्यात आले. अशाप्रकारे मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये एकंदर २१६३ यूनिट रक्तदान करण्यात आले. डोंबिवली येथील शिबिरात रेडक्रॉस रक्तपेढीने १२१ यूनिट, ठाणे सिव्हील हॉस्पिटलने १०० यूनिट आणि सर जे.जे.महानगर रक्तपेढीकडून १३३ यूनिट रक्त संकलित करण्यात आले.
देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान अभियानाचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथून केला. याप्रसंगी झूप ॲपच्या माध्यमातून सद्गुरु माताजींनी सर्व शिबिरांना सामूहिक रूपात आपले आशीर्वाद प्रदान करताना म्हटले, ‘‘आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित राहील या भावनेतून आपण जीवन जगायचे आहे.’’
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की बाबा गुरबचनसिंहजी यांचे जीवन व शिकवण यांमधून प्रेरणा घेत आपण मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यायचे आहे. याशिवाय सद्गुरु माताजींनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या महान शिकवणूकीचाही उल्लेख केला, की रक्तदानाच्या माध्यमातून आपण मानवतेच्या सेवेत बहुमूल्य योगदान देऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतो. एखाद्या भक्ताला काही कारणाने करता आले नाही तरी रक्तदान करण्याची जी त्याची भावना आहे ती निश्चितच स्वीकार्य आहे.
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वबंधुत्व आणि एकोप्याचा संदेश जगभरात दिला. त्याबरोबरच समर्पित गुरु-भक्त महान सेवादार चाचा प्रतापसिंहजी व अन्य भक्तांचेही या दिवशी आपण स्मरण करतो, ज्यांनी मानवतेच्या भल्यासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान दिले. ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी मिशनकडून दरवर्षी २४ एप्रिल रोजी संपूर्ण देशात सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केले जातात शिवाय वर्षभर चालत राहणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या विशाल श्रृंखलेचाही प्रारंभ केला जातो.
समालखा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सद्गुरु माताजींचे जीवनसाथी आदरणीय रमित चाननाजी यांनी स्वत: रक्तदान करुन मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले. हे सर्वविदित आहे, की संत निरंकारी मिशन नेहमीच मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या सेवांबद्दल प्रशंसेस पात्र ठरले असून कित्येक राज्यांकडून सन्मानित केले गेले आहे. जनकल्याणासाठी या सेवा निरंतर जारी आहेत.