नेशन न्युज मराठी टिम.
नवी दिल्ली – कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथील एनएएससी कॉम्प्लेक्स येथे 2022-23 च्या खरीप अभियानासाठी राष्ट्रीय कृषी संमेलनाचे उद्घाटन केले. त्यांनी समाधान व्यक्त केले की दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार (2021-22) देशात एकूण 3160 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो एक सार्वकालीन विक्रम असेल.
डाळी आणि तेलबियांचे उत्पादन अनुक्रमे 269.5 आणि 371.5 लाख टन असेल. तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2020-21 मध्ये फलोत्पादन 3310.5 लाख टन आहे , जे आतापर्यंतचे सर्वाधिक फलोत्पादन आहे. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशके आणि बियाणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्र काम करतील असे ते म्हणाले. . युरियाच्या जागी नॅनो-युरिया वापरण्याची रणनीती अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकार नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीवर यापुढेही भर देत राहील, असे त्यांनी जाहीर केले. निर्यातीबाबत ते म्हणाले की, कृषी निर्यातीत वाढ होत असताना अन्य दर्जेदार उत्पादनांकडेही लक्ष दिले पाहिजे , जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. निर्यातदार आणि शेतकरी या दोघांचाही फायदा झाला पाहिजे.
मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून खरीप हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्ट निश्चित करणे, महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि उत्पादन आणि पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा या परिषदेचा उद्देश होता. सरकार तेलबिया आणि कडधान्यांमध्ये स्वयंपूर्णता आणि पामतेल उत्पादन यांना प्रोत्साहन देण्याकडे लक्ष केंद्रित करून पीक विविधीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. देशात वैविध्यपूर्ण पिके घेण्यासंबंधी कार्यक्रमासाठी राष्ट्रीय धोरण आराखडा अंतिम करण्यासाठी प्रमुख राज्ये, संशोधक, उद्योग आणि धोरणकर्ते यासारख्या सर्व हितधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. शेती शाश्वत, फायदेशीर आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व राज्यांनी वैविध्यपूर्ण पिके घेण्यासाठी काम केले पाहिजे.
या संमेलनात चालू वर्षात 3160 लाख टन अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत 2022-23 या वर्षासाठी एकूण 3280 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.