नेशन न्यूज मराठी टीम.
शहापूर – केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या (आरईसी) अर्थसाह्यातून राज्यात राबवण्यात आलेल्या सौभाग्य योजनेमुळे लाभार्थ्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लागला. या योजनेमुळे मुलभूत गरज असलेली वीज गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात महावितरणला मदत झाल्याचे प्रतिपादन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले.
शहरी व ग्रामीण भागात घरोघरी वीज पोहचवण्यात सौभाग्य योजनेचा मोलाचा वाटा आहे. ही योजना राबवताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतू महावितरणने कंत्राटदारांच्या मदतीने गरजूंच्या घरी प्रकाश पोहचवण्याची ही योजना यशस्वी केली. आरईसीच्या श्रीमती सरस्वती यांनीही महावितरणमुळे ही योजना यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करतानाच या योजनेतून राज्यभरातील ५ लाख ५८ हजार ७०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्या मनोगतात आरईसी व महावितरणच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच उपस्थितांना एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. शहापूर तालुक्यातील योजनेचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी आरईसीच्या मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक सरस्वती चंद्रशेखर, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे व किशोर उके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, श्रीनिवास बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.