नदीच्या शेजारी डंपिंग ग्राउंड असणे हा सर्वात मोठा अपराध आहे – वॉटरमॅन राजेंद्र सिंह

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

कल्याण – कल्याण खाडीसह उल्हास आणि वालधुनी नदी अखेरच्या घटका मोजत आहे. आणि शासन तर या नद्यांना नाले बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची उद्विग्न टिका देशाचे वॉटरमॅन अशी ओळख असणाऱ्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या राजेंद्र सिंह यांनी कल्याणात केली. राजेंद्र सिंह यांनी आज कल्याण खाडीसह उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूरमधील उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या दुरवस्थेची जागरूक नागरिक, विद्यार्थ्यांसोबत पाहणी केली.

आपण आज उल्हानगर, अंबरनाथ बदलापूर येथील नद्यांची पाहणी केली, त्यांना आपण नदी बोलूच शकत नाही. ते एका घाणेरड्या नाल्याप्रमाणे दिसून येत असल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी बोलून दाखवली. तसेच जर इथली लोकं जागरूक नसती तर शासन दरबारी आज या नद्यांची नाले अशीच नोंद झाली असती. आणि आपले सरकार या नद्यांना नाले बनवण्यात प्रयत्नशील आहे. मुंबईतील 5 नद्यांनाही त्यांनी नाले बनवलं होते. परंतु आम्ही अशाच प्रकारे सर्व नद्यांची पाहणी करून शासन दरबारी त्यांची नदी अशी नोंद करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तर या नद्या सध्या आयसीयूमध्ये असून त्यांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले नाहीत तर या नद्या वाचणार नाहीत. तर कल्याण खाडीशेजारी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या खाडीशेजारी असणारे डंपिंग ग्राउंड हा सर्वात मोठा अपराध असून नदीशेजारी कधीही डंपिंग ग्राउंड असता कामा नये. या डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याच्या रासायनिक घटक पाण्यात मिसळतात आणि तिथली जमीन पूर्णपणे पडीक बनत असल्याने तातडीने शासनाने ते बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान यावेळी वॉटर मॅन राजेंद्र सिंह यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांच्यासह विविध जागरूक नागरिक आणि कल्याणातील एका खासगी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना राजेंद्र सिंह यांनी नद्या वाचवण्याचे महत्व अधोरेखित करून सांगितले. तसेच त्यांच्या परीने नद्या वाचविण्याच्या मोहिमेत हातभार लावण्याचे आवाहनही केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web