नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण– केडीएमसीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे महावितरणने त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. या वरून मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत केडीएमसीने तातडीने हे वीज बिल भरण्याची मागणी केली आहे.
या सर्व प्रकाराबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनीही तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आमदार पाटील यांनी ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या शिर्षकाखाली ट्विट करत निशाणा साधला आहे. उद्घाटनाचे कार्यक्रम, श्रेय लाटणे आणि बॅनर लावा असा जप करण्याऐवजी कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक सुविधांकडे लक्ष दिलेत तर बरं होईल आशा शब्दांत त्यांनी केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधार्याना लक्ष केले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत केडीएमसी विद्युत विभागाकडे विचारणा केली असता संबंधित भागातील महावितरणच्या थकबाकीची रक्कम ही ग्रामपंचायत काळातील असल्याचे माध्यमांना सांगण्यात आले. तसेच ही रक्कम वगळता संबंधित गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यापासून महावितरणची सर्व देयके नियमित भरली जात आहेत. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर त्यांनी लगेचच संबंधित भागातील स्ट्रीटलाईटचा वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहितीही विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.