झोपड्या वाचविण्याचा लढा माझा आहे- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – रेल्वेने घरं रिकामी करण्याच्या रहिवाशांना बजावलेल्या नोटीसांप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मध्यस्थी करावीच लागेल. तसेच महाराष्ट्रातील कायदा महाराष्ट्रातील झोपड्यांना वाचवू शकतो. तर केंद्रालाही हीच भूमिका घ्यावीच लागेल आणि महाराष्ट्रातील कायद्याला मान्यता देऊन सगळ्या झोपड्यांना संरक्षण द्यावेच लागेल अशी भूमिका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. कल्याण पूर्वेत रेल्वेने नोटीसा बजावलेल्या आनंदवाडी परिसरातील रहिवाशांची जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी या रहिवाशांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कळव्यातील 35 हजार झोपडीधारकांच्या घरांवर जेव्हा असेच संकट आले तेव्हा आपण 3 तास रेल्वे रोखून धरली होती आणि केंद्र सरकारला आपला निर्णय फिरवण्यास भाग पाडले होते अशी आठवण आव्हाड यांनी करून दिली. तर हा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नसून केंद्राविरोधात आहे. हे केंद्र सरकार एवढे निर्दयी कसे होऊ शकते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्य सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही योजना आणू आणि या झोपडीधारकांचे पुनर्वसन करू. या कारवाईत सुमारे पाच लाख लोक बाधीत होणार आहेत. एवढ्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी मिलिट्रीला बोलवावे लागेल. हे सर्व गोरगरीब लोकांना घाबरविण्यासाठीच करण्यात आले आहे. आधी घाबरवून सोडायचे आणि नंतर घरं वाचविण्याचे आमीष दाखवायचे हे तंत्र केंद्रातल्या सरकारचे असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

याठिकाणी राहणारे लोक हे पोटापाण्यासाठी गाव सोडून आले आहेत. इथे थोडेसे सन्मानाने जगण्याची संधी आली असतानाच ही नोटीस आली आहे. पण, नोटीस पाठवणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे, गरीबी शाप असला तरी गरीब माणूस लाचार नाही. प्रसंगी जीव देऊ पण, घर सोडणार नाही. आता रेल्वेचे विस्तारीकरण नसतानाही जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, हे ध्यानात ठेवा, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारप्रमाणे केंद्र सरकारने भूमिका घेऊन कायदा करून योजना आखावी आणि पुनर्वसन झाल्या शिवाय नागरिकांवर बेघर होण्याची पाळी येऊ देऊ नये असे आवाहनही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.
याप्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web