डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत केडीएमसी प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टिका डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. पालिका आयुक्त नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असून प्रशासनाने आरोग्य कृती आराखडा कधी बनवणार असा सवालहि उपस्थित केला. करोना संकटात पालिका आयुक्तांनी शंभर टक्के या शहराचे लसीकरण झाले पाहिजे याचा कृती आराखडा तयार करावा मात्र त्याकडे का लक्ष नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच विकास कसा करायचा असेल तर वेंगुर्ला नगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे येथील अधिकाऱ्यांनाही पहिले पाहिजे असेही सांगितले.
वेंगुर्ला नगरपरिषदेचा विकास पॅटर्न केडीएमसीने राबवावा अशी मागणी करत येथील गेल्या पाच वर्षात विकासाचे व्हिजन कागदावरून प्रत्यक्षात कसे करून दाखवायचे याचा आदर्श म्हणजे हि नगरपरिषद असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.व्हिजन असल्यास अनेक विकास कामे पूर्ण होत असून केडीएमसीतील अधिकाऱ्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विकास कामांची पाहणी करावी असा सल्ला आमदार चव्हाण यांनी दिला.