डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १ डिसेंबरपासून १ पहिलीपासून शाळा सुरु करण्याचे ठरविले होते. मात्र ओमायक्राॅन विषाणूने पुन्हा एकदा सर्वाना चिंतेत पाडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेऊन मुलांच्या आरोग्याशी खेळू नये असे पालकवर्गांचे म्हणणे आहे.शिक्षण स्वाभिमानी संघटनेने सरकारच्या या निर्णयाला ठाम विरोध केला आहे. या निर्णयाबाबत सरकारने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने द्यावी अशी मागणी पालकांनी पत्रकारांशी बोलताना केली.याबाबत संघटनेने महापालिकेला या बाबत लेखी पत्र दिले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, सल्लागार डॉ.अमित दुखंडे यांसह पालक उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष गायकवाड पालकांची बाजू मांडताना राज्य सरकारने कोविडचे संकट अजून पूर्ण न गेल्या मुळे शाळा सुरु करण्या बाबतचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. तर पालक पद्मजा तेजव म्हणाल्या,गेली दीड वर्ष ऑनलाईन पद्धतीने शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. करोनाचे संकट दूर होईपर्यत राज्य सरकारने ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याबाबतचा निर्णय घेऊ नये अशी आमची विनंती आहे.
अध्यक्ष गायकवाड हे पुढे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात अनेक पालक संघटना आहेत. या सर्व पालक संघटनेशी आमची चर्चा सुरु आहे.डोंबिवलीतील जवळपास ८० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांना विचारात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.