कल्याण/संघर्ष गांगुर्डे -उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदी मित्रांनी नदी किनारी जमून नदीच्या पात्रत 1500 शिंपले सोडले आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे नदी मित्रांनी सांगितले.देवदिवाशीचे औचित्य साधून सगळे नदी मित्र नदी किनारी मोहने परिसरात जमले होते. यावेळी नदी मित्रांनी नदीचे पूजन केले. उल्हास नदी बचाव कृती समितीकडून नदी बचावासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहे.
तसेच मी कल्याणकर संस्थेच्या पुढाकाराने नितीन निकम यांनी तीन वेळा नदी पात्रत बसून उपोषण केले होते. दोन वेळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे उपोषण सोडविले होते. तर एकावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे उपोषण सोडविले होते. नदी पात्रात यापूर्वी काही हजार मासे सोडण्यात आले होते. आत्ता नदी मित्रांनी 1500 शिंपले सोडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी एक प्रयत्न केला आहे.
मोहने गाळेगाव नाल्यामध्ये प्रशासनाकडून 3 दगडी बंधारे बांधले जात असून थातूरमातूर उपाययोजना करुन प्रदूषण रोखता येणार नाही. डिसेंबर अखेर नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुन्हा एकदा उपोषण केले जाणार असल्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.