कल्याण परिमंडलात लघुदाब वीज ग्राहकांकडे २५५ कोटी थकीत,थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे- महावितरणच्या कल्याण परिमंडलात ऑक्टोबर अखेरला अवघे पाच दिवस शिल्लक असताना या महिन्याच्या उद्दिष्टातील 313 कोटी रुपये वसूल होणे अजूनही बाकी आहेत. लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळता) ग्राहकांकडे असलेल्या 255 कोटी रुपयांच्या थकबाकीचाही यात समावेश आहे. त्यामुळे थकीत वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय सध्या वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन थकबाकीदार ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला कठीण आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके वसुलीच्या कामात व्यस्त आहेत. कल्याण परिमंडलात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 37 हजार 318 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 20 हजार 554 ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुन:र्जोडणी शुल्क भरून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला. तर एक हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले सुमारे 56 हजार ग्राहक रडारवर आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती ग्राहकांकडे 135 कोटी, व्यावसायिक ग्राहकांकडे 43 कोटी, औद्योगिक ग्राहकांकडे 65 कोटी, इतर ग्राहकांकडे 12 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे.वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा २९ ऑक्टोबरपर्यंत कधीही खंडित होईल. एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत‍ होणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी अथवा इतराकडून वीज घेणे किंवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास कायदेशिर व दंडात्मक कारवाई सुरु आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दिवाळी अंधारात जाणार नाही, याची दक्षता घेऊन त्वरित वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील थकबाकीदार वीज ग्राहकांना केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web