केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. महापालिका परिसर महापालिकेच्या नागरिकांसाठी स्वच्छ व सुंदर व्हावा याकरीता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ऑक्टोबर मध्ये महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी राबविल्या जाणा-या कायापालट अभियानांतर्गत २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जाणा-या “विशेष स्वच्छता सप्ताहाचा” प्रारंभ आज सकाळी ७ वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा प्रमुख उपस्थितीत खडकपाडा सर्कल येथे झाला.

 या विशेष स्वच्छता मोहिमेच्या वेळी उपआयुक्त रामदास कोकरे, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. सार्वजनिक अधिकारी अगुस्तीन घुटे, ब प्रभाग सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, उप अभियंता प्रविण पवार, सहा जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, उदयान अधिक्षक अनिल तामोरे व अन्‍य अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रिव्हर साईड रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि रवी पाटील फाऊंडेशनच्या सदस्यांनी सुध्दा या विशेष स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग दर्शविला.

  आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेल पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. यामध्ये पावसामुळे रस्त्यावर साचून राहिलेली माती आणि कचरा साफ करणे, रस्ता दुभाजक साफ करणे, त्यावरील गवत काढून टाकणे आदी कामे करण्यात आली. महापालिकेच्या इतर प्रभागातही संबंधित प्रभागाच्या सहा. आयुक्तांच्या उपस्थितीत आज सकाळी कायापालट अभियान राबविण्यात आले.

 फेरीवाल्यांकडील, दुकानदारांकडील कचरा रस्त्यावर टाकला जातो त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते, त्यामुळे आपले शहर स्वच्छ व सुंदर राहावे ही जबाबदारी महापालिकेची आहेच, तशी नागरिकांची देखील आहे. नागरिकांनी देखील रस्त्‍यावर कचरा टाकणे टाळावे आणि आपला कचरा महापालिकेच्या घंटागाडीतच दयावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी यावेळी केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web