डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली राज्यातील नाट्यगृहे आजपासून (23 ऑक्टोबर) ऑक्टोबरपासून पुन्हा उघडली आहेत. तर राज्यातील पहिल्या नाट्यप्रयोगाचा मान सांस्कृतिक उपराजधानी असणाऱ्या डोंबिवलीला प्राप्त झाला आहे. येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. या प्रयोगासाठी कल्याण डोंबिवलीसह मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील नाट्यप्रेमी सहकुटुंब दाखल झालेले दिसून आले.एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा पहिला प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे शनिवारी दुपारी पार पडला. यावेळी सरकारच्या निर्णयानुसार नाट्यगृहाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के आसन व्यवस्था करण्यात आली. नाट्यगृहाची आसन व्यवस्था ९७० असून त्यामध्ये ४८५ तिकीट विक्री करण्यात आली. नाट्यरासिकांचा उत्साह पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी आनंद व्यक्त केला.
सरकारच्या अटी आणि शर्तीनुसार राज्यभरातील नाट्यगृहाचा पडदा उघडला. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांची खरी दिवाळी आजपासूनच सुरू झाली आहे असे आनंद उद्गार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी डोंबिवली येथे काढले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील नटराजाचे पूजन करून नाटकाची घंटा वाजवण्यात आली. यावेळी अभिनेते दामले यांनी सरकारकडे नवीन कलाकारांना चांगले दिवस यावे यासाठी काही सुविधा द्यावा अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
कोरोनामुळे नाट्यक्षेत्राचे जे नुकसान झाले त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही. त्याऐवजी राज्य शासनाने आम्हाला टप्प्याटप्प्याने सोयी – सुविधा वाढवून द्याव्या, तसेच 2022 पर्यंत राज्य शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्रासाठी शासनाने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास डिसेंबर 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी जसे होते तसे उभे राहिल असा विश्वासही प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
तर नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठ्या प्रमाणात सिरियलकडे वळाले असल्याची चिंता दामले यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्राला सध्या एका मोठ्या संक्रमणाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने सुविधा द्याव्यात. या सुविधा कागदावर असल्याने नाट्यक्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एका लग्नाची दुसरी गोष्ट ‘ नाटकाने याचा श्री गणेशा झाला आहे. तब्बल सहा महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला आणि तिसरी घंटा झाली. यामुळे नाटकाचे दिगदर्शक, कलाकार, निर्माते आणि टीमने आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे आतुरतेने वाट पाहत असलेल्या नाट्य रसिकांनीही मोठ्या प्रमाणात नाट्यगृहाच्या बाहेर तिकीट काढण्यासाठी गर्दी केली असून नाटकाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.
यावेळी ज्येष्ठ लेखक आनंद म्हासवेकर, कल्याण नाट्य परिषदेचे शिवाजी शिंदे, तरुण रंगकर्मी संकेत ओेक, गुजराथी नाट्यलेखन निरंजन पांड्या, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, महापालिका सचिव संजय जाधव तसेच नाटक पाहण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भांडुप येथून आलेले रसिक प्रेक्षक उपस्थित होते.