कल्याण/प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथील पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर हायवेलगत ९ ऑक्टोबर रोजी ३२४ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये जांभुळ, सिसम, वेळा, आवळा, वावळ आदि जातीच्या झाडांचा समावेश आहे. येत्या तीन वर्षांपर्यंत किंवा ही झाडे आत्मनिर्भर होईपर्यंत संत निरंकारी मिशनचे सेवादार त्यांचे संगोपन व संरक्षण करणार आहेत.
वर्तमान निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली ऑगस्ट, २०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या या नागरी वृक्ष समूह योजनेचा उद्देश हाच आहे की, धरतीवर प्राणवायुचे संतुलन कायम राहावे जो आपल्याला वृक्षांपासून प्राप्त होतो तसेच ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा प्रभाव कमी करण्यामध्ये अशा वृक्ष समूहांचे मोठे योगदान होऊ शकेल. दुसऱ्या बाजुला मानवजातीने यातून अशी प्रेरणा प्राप्त करावी, की विविध प्रकारचे वृक्ष जशा प्रकारे गुण्यागोविंदाने एकत्र वाढतात तद्वत समस्त मानवजातीने भेदभाव विसरुन अनेकतेत एकता व शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने वागून या जगाला आणखी सुंदर करावे.
कोपरखैरणे येथील या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे प्रथम महापौर तथा माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲङ पी.सी.पाटील, जयश्री पाटील, माजी नगरसेवक केशव म्हात्रे आणि शशिकांत भोईर आदि मान्यवर उपस्थित होते. या व्यतिरिक्त संत निरंकारी मंडळाच्या नवी मुंबई सेक्टरचे संयोजक मनोहर सावंत आणि सेवादल क्षेत्रीय संचालक अरुण पाटील व अशोक केरेकर यांच्यासह मंडळाच्या अनेक शाखांचे मुखी व सेवादल अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे शशी परब आणि अन्य स्वयंसेवकदेखिल उपस्थित होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. ,२१ ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आलेल्या या अभियाना अंतर्गत आतापर्यंत देशभरातील ३५५ ठिकाणी १,५०,००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.