भिवंडी/प्रतिनिधी – सध्या राज्यातील कोरोना संकट आटोक्यात आले असल्याने राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते पुढील वर्गाच्या शाळा सुरु केल्या असून सोमवारी तब्बल दिड वर्षानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. भिवंडीतील जिल्हा परिषद शाळा राहनाळचे मुख्यध्यापक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करून शाळेपयोगी साहित्य वाटप करत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी, भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती व सदस्य ललिता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, ग्राम विस्तार अधिकारी अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण नाईक, संदीप नाईक, पंकज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक आदी उपस्थित होते.
मागील दीड वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुले प्रथमतःच शाळेत आलेली आहेत. या मुलांनी आपला भविष्यकाळ उज्वल करावा, शाळेचे त्याचबरोबर गावाचं नाव मोठे करावे अशा शुभेच्छा यावेळी राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी विद्यार्थ्यांना दिल्या . राहनाळ जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात आले असून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल चेक करून सॅनिटायझरने हात स्वच्छ करत विद्यार्थ्यांचे स्वागत कंपास बॉक्स, गुलाबपुष्प, आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. शाळेमध्ये सर्वत्र कोरोनाचे नियम पाळावेत, आपला अभ्यास कसा करावा यासाठी छोटे छोटे बॅनर लावण्यात आले. या प्रसंगी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी शिक्षिका अनघा दळवी, संध्या जगताप, रसिका पाटील, चित्रा पाटील आदी शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक अजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनघा दळवी यांनी केले.