राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून महावितरणची ३९ लाखांची थकबाकी वसूल,१६१ ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित १६१ ग्राहकांची घरे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. या ग्राहकांनी महावितरणकडून उपलब्ध करून दिलेल्या सवलतीचा लाभ घेत ३९ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी भरून तडजोड केल्याने त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडलातील जवळपास १५ हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक न्यायालयात सहभागी होण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतू १६१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व ३९ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवलीत २५, कल्याण पश्चिमेत १६ आणि कल्याण पूर्व विभागात १२ अशा एकूण ५३ ग्राहकांनी थकीत २३ लाख ५७ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला.

तर कल्याण मंडल दोन अंतर्गत १० लाख २४ हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या ४७ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. यात उल्हासनगर न्यायालयात २६ व कल्याण येथील न्यायालयात २१ प्रकरणांचा समावेश आहे. वसई मंडलांतर्गत वसई व विरामधील ६१ ग्राहक लोक अदालतीत सहभागी झाले. परंतू १३ प्रकरणांमध्ये २ लाख ९० हजार रुपयांची वसूली होऊ शकली. पालघर मंडलात सर्वाधिक १९४ ग्राहकांनी सहभाग नोंदवला. यातील ४८ ग्राहकांनी २  लाख ७३ हजार रुपयांचा भरणा करून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते, सहायक विधी अधिकारी राजीव वामन, शिल्पा हन्नावार, उपविधी अधिकारी दीपक जाधव यांनी प्रयत्न केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web