कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १५ हजार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुकास्तरावर शनिवारी २५ सप्टेंबर आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.
परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित १५ हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते, संबंधित अधिकारी, विधी अधिकारी, उपविधी अधिकारी दीपक जाधव आदी राष्ट्रीय लोक अदालतीत उपस्थित राहणार आहेत.