भिवंडीतील चिंचोटी मानकोली महामार्गाची दुरावस्था, खारबाव नाक्यावर पुन्हा खड्डयांचे साम्राज्य

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून गणेशोत्सवा पूर्वी दुरुस्ती केलेल्या खारबाव नाक्यावर पुन्हा खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने नेमकी दुरुस्ती कशी केली होती असा प्रश्न निर्माण झाला आहे.                  

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलने देखील केली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग , पोलीस प्रशासन व टोल कंपनी नागरिकांना रस्ता लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगतात व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची आश्वासने देतात. त्यांनतर आंदोलन स्थगित झाल्या नंतर रस्त्याची थातूर मातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी आपले हात झटकतात. ज्याचा त्रास स्थानिक नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेक नागरिकांचा जीव गेला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे मात्र याकडे सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.               

सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय गाव विकास संघर्ष समिती स्थापन केली असून या संघर्ष समितीच्या वतीने मागील महिन्यात १८ ऑगस्ट रोजी या महामार्गावर कामण , खारबाव , कालवार व अंजूरफाटा अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी रास्तारोको आंदोलने केली त्यांनतर रस्त्याच्या दुरुस्तीचा देखावा कंपनीमार्फत करण्यात आला . आता पुन्हा या रस्त्याची दुरावस्था झाल्याने खारबाव नाक्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कंपनी बरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web