कल्याण/प्रतिनिधी – पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले. कल्याण सार्वजनिक वाचनालयाने जयंत पवार यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी ‘अभिवादन व अभिवाचन सभा’ आयोजित केली होती. या सभेला साहित्यप्रेमी, रंगकर्मी तसेच नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. केवळ त्यांच्या आठवणी, किस्से यांना उजाळा न देता त्यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन करून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जयंत पवार यांचा पिंड पत्रकारितेचा. त्यांनी अनेक वर्ष पत्रकार म्हणून ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये काम केले. त्याच वेळी ते नाटककार म्हणून देखील रंगभूमीवर कार्यरत राहिले. गिरणी संपाची पार्श्वभूमी असलेले त्यांचे ‘अंधातर’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर गाजले आणि पुढे जाऊन त्यावर ‘लालबाग परळ’ हा सिनेमा देखील आला. ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’, ‘दरवेशी’, ‘पाऊलखुणा’,‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, ‘माझे घर’, ‘वंश’, ‘शेवटच्या बीभस्ताचे गाणे’, ‘होड्या’(एकांकिका) , ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ आणि ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ (कथासंग्रह) यांसह अन्य साहित्य प्रकाशित आहे. मराठी साहित्यात भूमिका घेऊन लिहिणाऱ्या लेखकांपैकी ते एक होते. मराठी नाट्यवर्तुळात पवार यांची नाटकं मैलाचा दगड ठरली आहेत.
अत्रेया नाट्यसंस्थेने त्यांच्या “शेवटच्या बीभत्साचे गाणे” या एकांकिकेचे अभिवाचन करून सभेला सुरुवात झाली. या अभिवाचनाचे दिग्दर्शन अनुप माने यांनी केले होते तर स्नेहा साळवी, रमाकांत जाधव, अमेय भालेराव आणि दुर्गेश बुधकर यांनी सहभाग घेतला. सावाकच्या करुणा कल्याणकर यांनी जयंत पवार यांच्यावरील रवींद्र पाथरे यांच्या लेखाचे अभिवाचन केले. शेवटी, श्रीरंग थिएटर, डोंबिवलीचे देवेंद्र शिंदे यांनी ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या कथासंग्रहातील “पोकळी” या गोष्टीचे अभिवाचन केले. सावाकचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानून अभिवादन सभेची सांगता केली.