डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – नाका कामगारांचे पोट हातावर आहे. गेले दोन वर्ष मोठ्या प्रमाणत या नाका कामगारांनी कोरोना काळात संयम राखत काम बंद ठेवले. मात्र या काळात त्यांना स्वतःला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा नाका कामगारांसाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकत ज्या कामगारांनी एक लस घेतली आहे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र एक लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यासाठी ८४ दिवसांचा कालावधी लागत असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. त्यातच ज्या व्यक्तींना नुकताच कोरोना झाला आहे त्या व्यक्तींना 90 दिवस पूर्ण झाल्याशिवाय लस घेता येत नाही मात्र अशा व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. त्यामुळे लस घेण्यासाठी दोन लसी मधील अंतर कमी करावं अशी मागणी महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ , माणिक उघडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे. इतकेच नव्हे तर एक लस झालेल्या नाका कामगारांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली तर नाका कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. टाळेबंदीमध्ये या कामगारांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आता हे हाल थांबणे आवश्यक असून त्यांना प्रवास करण्याची मुभा मिळावी. एकूण ७००० नाका कामगार असून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, आंबिवली, टिटवाळा आदी ठिकाणाहून हे कामगार येत असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.निवेदन देते समयी मजदूर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राणा शेठ, नवनाथ मोरे, रामेश्र्वर काळे महाराज, ज्ञानेश्वर भोसले, बाजीराव माने, उपस्थित होते.