भाजप कार्यालयावर हल्ला प्रकरण,शिवसेनेचे विजय साळवी यांच्या अटकेची भाजपकडून मागणी

कल्याण/प्रतिनिधी– केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजपकडून, शिवसेनेला यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा सज्जड इशारा दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला.

केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर कल्याणात मात्र शिवसेनेकडून निषेध करण्यासह भाजपच्या शहर कार्यालयावर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.
तसेच शिवसेनेमध्ये खरोखर हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहीजे होता. मात्र यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा सज्जड इशाराही यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web