कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम राबवली खरी. मात्र कामचुकार ठेकेदारामुळे शून्य कचरा मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कचरा उचलण्याचे काम ज्या ठेकेदाराचे आहे त्या ठेकेदाराला पालिकेने अनेकदा नोटीस देऊनही तो जुमानत नसल्याची कबुलीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली या कामचुकार ठेकेदारविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोकेदुखी ठरलेली कचरा समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या.उंबर्डे , बारावे या ठिकाणी कचराविघटन प्रकल्प सुरू करत आधारवाडी डम्पिंग महत्प्रयासाने बंद केलं .ओला सुका कचरा वर्गीकरण, कचराकुंडी हटाव मोहीम अशा विविध उपाय योजना राबवल्या.काही अंशी पालिकेच्या प्रयत्नांना यश आलं मात्र पालिकेच्या या प्रयत्नांना काम चुकार ठेकेदारामुळे खीळ बसत असल्याचे दिसून येतेय. महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील 2 प्रभागामधील कचरा उचलण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आलंय . संबंधित ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकदा या प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत .अनेक ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत पडून असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे .तर खडकपाडा येथील पालिकेच्या पार्किंगच्या जागेत या ठेकेदाराच्या 15 ते 20 गाड्या भंगार अवस्थेत पडून आहेत . त्याहून धक्कादायक बाब या सर्व गाड्या कचऱ्याने खचाखच भरलेल्या आहेत. तर या ठेकेदाराला अनेकदा नोटिसा पाठवून देखील ठेकेदार जुमानत नसल्याची कबुली दस्तुरखुद्द पालिकेने दिली. त्यामुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला ठेकेदारामूळे खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.