गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे सोडण्याचीआमदार राजू पाटिल यांची मागणी

कल्याण/प्रतिनिधी – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली आहे.

कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी व्यवसायानिमित्त दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरसह कसारा-खोपोली राहतात. दरवर्षी सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आपापल्या मुळ गावी जाऊन पारंपारीक पद्धतीने सण साजरा करतात. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून दिव्याला थांबा असणारी दिवा- सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या अद्यापही सुरु नाहीत.
आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यात दिवा जंक्शनमधून एकही गाडी सुटणार नसल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
कोवीडची तिसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून रेल्वे प्रवासालाही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 2 डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी सद्यस्थितीत बहुतांश जणांचे दोन डोस दूरच पण अद्याप एकही डोस झालेला नाही. अशा परिस्थितीत दिवा ते अगदी खोपोली, कसारा पर्यत राहणाऱ्या कोकणकरांना गावी जाण्यासाठी ठाणे, दादर, सीएसएमटी किंवा पश्चिम रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे शक्य होणार नसून नागरिकांचे हाल टाळण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रेल्वेने याची तातडीने दखल घेऊन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या दिवा जंक्शनवरुन दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह जास्तीत जास्त गणेशोत्सव स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी आमदार पाटील यांनी रेल्वेकडे केली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web