ठाणे/प्रतिनिधी – संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा झाला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला, जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत,अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला, तिरंग्याला मानवंदना दिली.
उपेक्षित कष्टकरी देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या, शाहिद झालेल्या हुतात्म्यांना सलामी देऊन साडेतीन दशकांची श्रमजीवी परंपरा अबाधित ठेवली. यावेळी भाषणात विवेक आणि विद्युलता पंडित यांनी खरे स्वातंत्र्य गरीब सामान्यांना मिळवून देण्यासाठी लढाईची हाक दिली. हे अमृत महोत्सवी वर्ष संघर्ष वर्ष असेल असे सांगितले. श्रमजीवी सैनिकांनी एक वर्ष देशासाठी अर्पण करावे, वर्षभरात सरकार आणि अधिकाऱ्यांना ते मालक नाहीत नोकर आहेत याची जाणीव करून देण्यासाठी श्रमजीवी संघर्ष करेल असे यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी काढले. यावेळी वज्रेश्वरी पासून तब्बल तीन तास रॅली ने गणेशपुरी पर्यंत येऊन झेंडावंदन केले. यावेळी अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणूक आणि मनसोक्त नाचत गाजत जल्लोष साजरा केला.
यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, केशव नानकर, कार्याध्यक्ष ऍड स्नेहा पंडित दुबे, सेवा दल प्रमुख आराध्या पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, युवा उद्योजक रोहन गायकवाड, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, सुरेश रेजड, हिरामण नाईक आदी पदाधिकारी होते.