कल्याणात आपच्या कार्यकत्याचा मेळावा,सत्ता आल्यास दिल्लीप्रमाणे सुविधा देण्याचे आश्वासन

कल्याण/प्रतिनिधी – आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता दिल्यास दिल्लीप्रमाणे नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आम आदमी अर्थातच आपने दिले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्याप्रसंगी बोलताना आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिले आहे.आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा सर्वच राजकीय पक्षांपुढे मांडला आहे. दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजना आज जनतेच्या कौतुकाच्या व प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत.
दिल्लीतील सरकारी शाळांची तुलना खासगी शाळांसोबत केली जात आहे. त्याचबरोबर घरपोच दाखले- प्रमाणपत्रे, २०० युनिट मोफत वीज, मोफत पाणी अशा सुविधांची गेल्या १० वर्षांपासून
अंमलबजावणी केली जात असल्याचेही राचुरे यांनी सांगितले. आजपर्यंत देशात अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता आणि धाडस दाखवले नसून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यास कल्याण डोंबिवलीतही दिल्ली मॉडेल राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. इथल्या जनतेने आतापर्यंत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतला असून एकाही पक्षाने ‘आप’प्रमाणे स्वच्छ कारभार केलेला नसल्याचे यावेळी प्रदेश निरिक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीकरांना ‘आप’ या सुविधा देणार..

१) मोफत पाणी

२) महिला – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास

३) खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते

४) महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणार.

५) फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणार.

६) महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणार.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web