कल्याण/प्रतिनिधी – कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या स्मारका जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना देण्यात आली.
२६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सरकारने पाकिस्तान सरकारला मान खाली घालण्यास भाग पाडले. त्या कारगिल युद्धामध्ये बरेच जवान शहीद झाले. अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले.
कारगिल युद्धातील सर्व शहिदांना मनपूर्वक मानवंदना करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.