नवी मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम भावनेने मानवतेची सेवा करण्याची शिकवण कृतीत उतरवत ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये भर पावसातही ११२ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. खरं तर १४२ रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती ज्यामध्ये ज्ञानविकास संस्थेच्या ७ कॉलेज विद्यार्थ्यांचाही समावेश होता. तथापि, रक्तदानाच्या निकषांची पुर्तता होत नसल्याने त्यापैकी ३० जणांना रक्तदान करता आले नाही. संत निरंकारी रक्तपेढी द्वारे हे रक्त संकलीत करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन दिल्लीहून आलेले संत निरंकारी मंडळाचे महाराष्ट्र व दक्षिण भारतीय राज्यांचे प्रभारी मोहन छाब्रा आणि ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी.सी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुखी, सेवादल संचालक आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी सुंदर प्रकारे या शिबिराचे आयोजन केले.