डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा प्राप्त न झाल्याने बंद आहेत. तर दुसरीकडे मनसे तर्फे आज कल्याण ग्रामीण भागात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यँत 2 हजार नागरिकांचे निशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. आज लसीकरणास रिक्षा चालकांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेचे लसीकरण केंद्र तर दहा बारा दिवस बंद राहणार असतील तर कसं काय ब्रेक द चैन कराल, केंद्र सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जोपर्यंत लसींचा साठा प्राप्त होत नाही तोपर्यंत नवी मुंबईच्या पार्श्वभूमीवर लस विकत घ्याव्यात, कोव्हीड सेन्टरवर करोडो रुपये खर्च करता मग लसीकरनावर का केला जात नाही असा सवाल केला. तसेच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा ड्राइव्ह घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी राजू पाटील यांच्या आमदार निधीतून कार्डीक रुग्णवाहिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भेट म्हणून देण्यात आली. या रुग्वाहीकेचे लोकार्पण केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त रामदास कोकरे, मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक हर्षद पाटील, लाल बावटा रिक्षा युनियनचे काळू कोमास्कर, माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.