केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला

कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19  इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत   25 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये  स्मार्ट सिटी ॲवार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यातील निवडीचे निकष हे मुख्यत: केलेल्या कामाच्या गुणवत्तेशी निगडीत होते. स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत सन 2016 पासून विविध टप्‍प्यांमध्ये एकुण 100 शहरांची निवड केली होती. यातील पहिल्या टप्प्यात 20, दुस-या टप्प्यात 40, तिस-या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता. या स्पर्धेसाठी टप्पेनिहाय पारितोषिकांसाठी वेगवेगळी संवर्गात निवड प्रक्रिया जाहिर करण्यात आली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंन्ट कार्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने “कोविड इन्होवेशन अवॉर्ड” या गटासाठी नामांकन सादर केले होते. एकुण निवड प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात सर्व शहरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या एकंदरीत कामगिरीसाठी बाद फेरी तत्वाप्रमाणे काही निकष ठरविण्यात आले होते. 

दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड केली गेली होती. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेले हे ॲर्वाड म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे,  कोविड कालावधीत महापालिकेल्या मदत करणा-या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी / कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळयांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपध्दती यापुढीही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web