अखेर कल्यानचा नवीन दुर्गाडी पुल वाहतुकीसाठी खुला,वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेनचे अखेर आज लोकार्पण करण्यात आले असून गेल्या काही वर्षापासून भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन तर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. तर या लोकार्पण सोहळ्यात सोशल डिस्टन्सचा चांगलाच फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कल्याण भिवंडी शहराला जोडणारा तसेच ठाणे, मुंबईकडे जण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा मनाला जातो. कल्याण शहरासह आसपासच्या शहरातील हजारो नागरिक याचा वाहतुकीसाठी वापर करतात. मात्र वाहतुकीसाठी वापरत असलेला पूल अपुरा पडत असल्याने तब्बल ६ वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली. अखेर आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्यांना करावी लागणारी तारेवरची कसरत आता थांबणार आहे.

जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास आणि सहन करावा लागत होता. आज यापैकी नविन दोन लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या चार लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नविन आणि २ जुन्या अशा ८ लेन नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, केडीमसी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web